MI vs RCB : सलग 3 पराभवानंतर कॅप्टन हार्दिकचा संताप, चौथ्या सामन्याआधी स्पष्ट संकेत, कुणाचा पत्ता कट होणार?
Hardik Pandya Post Match Presentation MI vs RCB : मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानातील आणि सलग तिसरा पराभव कर्णधार हार्दिक पंड्या याच्या जिव्हारी लागला. आरसीबी विरूद्धच्या पराभवानंतर कॅप्टनने संघात बदल करणार असल्याचे संकेत दिले.

मुंबई इंडियन्स तब्बल 14 वर्षांनंतर आयपीएल स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने करण्यात यशस्वी ठरली. मुंबई इंडियन्सने 2012 नंतर तब्बल 2026 साली (IPL 2026) स्पर्धेतील आपला पहिला सामना जिंकला. मुंबईने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करत विजयी सलामी दिली. मात्र त्यानंतर मुंबईची गाडी ट्रॅकवरुन घसरली. मुंबईला दिल्ली कॅपिट्ल्सनंतर राजस्थान रॉयल्सकडून पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे मुंबई रविवारी 12 एप्रिलला घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत करुन कमबॅक करेल, अशी आशा होती. मात्र पलटणने निराशा केली.
आरसीबीच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करत स्कोअरबोर्डवर 240 धावा लावल्या. त्यामुळे मुंबईला 241 धावांचं अवघड आव्हान मिळालं. मुंबईला धावसंख्येच्या हिशोबाने अपेक्षित सुरुवात करता आली नाही. टॉप ऑर्डरमधील फलंदाजांना आश्वासक सुरुवात मिळाली. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांनी पलटणच्या फलंदाजांना वेळीच आऊट केलं. रोमरियो शेफर्ड याने अखेरच्या क्षणी फटकेबाजी केली. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. मुंबईचा अशाप्रकारे हा सलग आणि एकूण तिसरा पराभव ठरला.
आरसीबीने मुंबईला 2025 नंतर पुन्हा एकदा पराभूत केलं आणि 19 व्या मोसमात एकूण तिसरा विजय मिळवला. मुंबईचा घरच्या मैदानातील पराभव कर्णधार हार्दिक पंड्या याला जिव्हारी लागला. हार्दिकने सामन्यानंतर बोलताना थेट संघात बदल करणार असल्याचे संकेत दिले. हार्दिक नक्की काय म्हणाला हे जाणून घेऊयात.
कॅप्टन हार्दिकला पराभव असह्य
सलग तिसऱ्या पराभवानंतर हार्दिकने आगामी सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करणार असल्याचं म्हटलं. “अनेक मुद्दयांबाबत फेरविचार करणं गरजेचं आहे. तसेच दुसरा पर्याय शोधावा लागेल, असंही हार्दिकने स्पष्ट केलं.
मुंबईने मधल्या ओव्हरमध्ये ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. त्यामुळे संतुलन बिघडलं. हार्दिकने यावरूनही प्रतिक्रिया दिली. “गेल्या काही सामन्यांपासून बॉलिंग आणि बॅटिंग यूनिट म्हणून मागे पडत आहोत. त्यामुळे आता चांगली कामगिरी कशी करता येईल याचा गांभीर्याने विचार करावा लागेल”, असं हार्दिकने नमूद केलं.
“दुसऱ्या पर्यायांचा विचार करावा लागणार”
“हार्दिकने पराभवानंतर अनेक बाबतीत पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं म्हटलं. मात्र दुसऱ्या पर्यायाचाही विचार करावा लागेल जे बॅटिंग आणि बॉलिंग करण्यात समर्थ असतील. टीमला अजूनही चांगली बॅटिंग आणि बॉलिंग करण्याची गरज आहे”, असं हार्दिकने स्पष्ट केलं.
