T20 World Cup 2026: उपांत्य फेरीत अभिषेक शर्माकडून ओपनिंग काढून घेणार? जर तसं झालं तर….
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा हुकूमाचा एक्का फेल गेला. तरी त्याच्यावर विश्वास टाकला जात आहे. असं असताना उपांत्य फेरीतही त्याला ओपनिंगला उतरवणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना 5 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे हा सामना हाय स्कोअरिंग असेल यात काही शंका नाही. या सामन्यासाठी टीम इंडियाला गाफील राहून चालणार नाही. कारण जेतेपदापासून टीम इंडिया दोन विजय दूर आहे. अशा स्थितीत उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग 11 काय असेल याबाबत उत्सुकता आहे. या सामन्यात बॅटिंग ऑर्डरही बदलली जाऊ शकते. कारण अभिषेक शर्मा काही फॉर्मात नाही. पण अभिषेक शर्माबाबत उपांत्य फेरीत एक निर्णय घेतला तर कदाचित धावांचा पाऊस पाडू शकतो. त्यामुळे टीम इंडियाला संघात बदल न करता मोठा फायदा होऊ शकतो. तसेच अभिषेक शर्मालाही यामुळे बूस्टर मिळू शकतो, असं क्रीडातज्ज्ञ म्हणत आहेत. अभिषेक शर्माच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करण्याची सूचना क्रीडाप्रेमी करत आहेत. त्यामुळे इंग्लंडवर दबाव राहील.
इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संजू सॅमसन आणि इशान किशन हे ओपनिंगला येतील. इशान किशन चांगल्या फॉर्मात आहे. तर संजू सॅमसनचा फॉर्मही परतला आहे. त्यामुळे या दोघांकडून टीम इंडियाला चांगली सुरूवात मिळेल. दोघेही पावरप्लेमध्ये आक्रमक सुरूवात करू शकता. दुसरीकडे, चेंडू थोडा जुना झाल्यानंतर अभिषेक शर्माला फायदा होईल. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला की त्यालाही जोरदार फटकेबाजी करता येईल. कारण नवा चेंडू खेळपट्टीवर कसाही वळतो. त्यामुळे फटकेबाजी करताना चुकू शकतो. पण चेंडू जुना झाला तर फलंदाजी करणं सोपं जातं. पण उपांत्य फेरीत इतका मोठा निर्णय घेणं वाटतं तितकं सोपं नाही.
वानखेडेवर अभिषेक शर्माची जादू
वानखेडे स्टेडियमवर अभिषेक शर्माची बॅट यापूर्वी तळपली आहे. त्याने याच मैदानावर इंग्लंडविरुद्ध शतक ठोकलं होतं. 2 फेब्रुवारी 2025 रोजी वानखेडेवर टी20 सामना खेळला गेला होता. त्यात अभिषेक शर्माने 13 षटकार मारले होते. त्याने 54 चेंडूत 135 धावांची खेळी केली होती. तेव्हा टीम इंडियाने 20 षटकात 247 धावा केल्या होत्या. तर इंग्लंडचा संघ 97 धावांवर गारद झाला होता. हा सामना भारताने 150 धावांनी जिंकला होता. आता तशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
