मुंबई : अनिल परब यांच्या कार्यालयावर काल कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात अनिल परब यांनी आपली बाजू मांडली आहे. वारंवार माझी बदनामी करण्याचे काम सुरू आहे. अनिल परब यांना टार्गेट केलं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी टार्गेट केलं असं दाखवायचं, त्यांच्या जवळची माणसं जी पक्ष बदलण्यास तयार होत नाहीत, म्हणून अशाप्रकारचा दबाव केवळ पक्ष बदलावा म्हणून टाकला जात असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे. किरीट सोमय्यांनी नारायण राणेंपासून ते यशवंत जाधव यांच्यापर्यंत आरोप केलेत ते सगळे आता भाजपमध्ये आहेत. त्यामुळे आता त्यांच्याबद्दल एक शब्दही उच्चारत नाहीये, त्यामुळे यासर्वांची उत्तर सोमय्यांना द्यावीच लागतील, असे म्हणत अनिल परब यांनी सोमय्यांना इशारा देखील दिला आहे.
अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत शिवसैनिकांना घेऊन नारायण राणेंचं अनधिकृत बांधकाम पाहायला जाणार असे सांगितले होते. यावर नारायण राणे यांना तुम्ही काय अल्टीमेटम देत आहात? असा प्रश्न विचारला असता त्यांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, या गोष्टी ठरवून केल्या जात नाही. ती काय सत्यनारायणाची पूजा नाही तारीख आणि वार सांगायला. ज्यावेळी वाटेल तेव्हा आम्ही शिवसैनिक जाऊ बघायला, असे ते म्हणाले.