राज्यात मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच आता मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाही समोर आलाय. एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांनी मुस्लिम आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलीय. औरंगाबादनंतर आता सोलापूरमधूनही मुस्लिम आरक्षणासाठी चलो मुंबईची हाक देण्यात आलीय. 11 डिसेंबरला मुस्लिम आरक्षणासाठी आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी वाचवण्यासाठी मुंबईला जाणार आहोत, अशी घोषणा असदुद्दीन ओवेसी यांनी दिलीय.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणायचे की एमआयएमला मत देऊ नका. भाजपला मत देण्यासारखं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणायचे की एमआयएमला मत देऊ नका, शिवसेना आणि भाजपला फायदा होईल. त्याचा परिणामही झाला. सोलापुरात काहींनी त्याला खरं समजलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आम्हाला भाजपची बी टीम म्हटलं. जेव्हा सत्ता स्थापना करावी लागली तेव्हा हेच लोक एकत्र आले आणि म्हटले आपण सगळे एक आहोत आणि मुसलमांना धोका नाही. शिवसेना सेक्युलर नाही. ते भाजपसारखेच जातीयवादी आहेत. पवार साहेब सांगा शिवसेना सेक्युलर आहे का? राहुल गांधी सांगा शिवसेना सेक्युलर आहे का? तुम्ही विसरलात का 1992 ला काय झालं? असा सवाल ओवेसी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केलाय.