पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
बीड जिल्ह्यात महिन्याभरापासून पाऊस नसल्याने सोयाबीनसह खरीपाची पिके करपली आहेत. खासदार बजरंग सोनवणे यांनी परळी तालुक्यातील शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या गंभीर स्थितीकडे लक्ष वेधले. शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत, चारा छावण्या आणि पाणीटँकर उपलब्ध करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर स्थितीत खरीपाचे प्रमुख पीक असलेले सोयाबीन मोठ्या प्रमाणात करपून गेले आहे. परळी तालुक्यातील अंबड शिवारात शेतकऱ्यांचे झालेले हे प्रचंड नुकसान खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहिले. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकवलेले पीक डोळ्यासमोर करपताना पाहून ते हवालदिल झाले आहेत.
पेरणीपासून काढणीपर्यंत केलेला खर्च वाया जात असल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. खासदार सोनवणे यांनी यावर चिंता व्यक्त करत शासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “बीड जिल्ह्यात 21 दिवसांपेक्षा जास्त काळ पाऊस न झाल्यास दुष्काळ जाहीर करणे बंधनकारक आहे, तरीही सरकारने अजून याची दखल घेतली नाही.” येत्या मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळ जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. सरकारने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, चारा छावण्या सुरू कराव्यात आणि पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे.
