विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवार (5 जुलै) पासून सुरु होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन दोन दिवसांच करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतलाय. पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचं असलं तरीही हे अधिवेशन चांगलंच गाजणार असल्याची शक्यता आहे. तसा इशाराच विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं दिलाय. दरम्यान, या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार 3 मुख्य प्रस्ताव मांडणार असल्याची शक्यता आहे. त्यात केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध, मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा आणि ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक इम्पेरिकल डाटा केंद्राने द्यावा, या प्रस्तावांचा समावेश आहे.