जळगाव : राज्यातील महाविकास आघाडीला खिंडार पाडत एकनाथ शिंदे यांनी बंडल केलं. त्यानंतर त्यांच्या या बंडात राज्यातील अनेक आमदार सामिल झाले. आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आहे. तर राज्यात सत्तेत असणारी आणि रस्त्यावर असणारी शिवसेना, खरी शिवसेना ही आमचीच असल्याचा दावा शिंदे गटातील नेत्यांकडून वारंवार करण्यात येत आहे. त्याचअंतर्गत आपल्या गटाला बळ देण्यासाठी मुंबईसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पक्ष कार्यालय सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान गुलाबराव पाटील यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. ते जळगाव मध्ये बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देताना म्हटलं आहे की, जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय उभे करा. याची जबाबदारी आपल्यावर आणि चंद्रकांत सोनोने यांच्यावर दिली आहे. त्याप्रमाणे जळगावात सध्या कार्यालयासाठी जागा बघण्याचे काम सुरू आहे.