मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या सामनामधून पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. ठाणे-पालघरमधील वेठबिगारीच्या प्रश्नावरून सामनातून शिंदे, फडणवीस सरकारवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. ठाणे -पालघरमधील (Palghar) वेठबिगारीचा प्रश्न समोर आला आहे. सर्वाधिक वेठबिगारी ही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आहे. मात्र आपले मुख्यमंत्री दिल्लीत विकासाचे नव्हे तर स्वत:चे बेकायदा सरकार वाचविण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी मुजरे झाडत असल्याचा घणाघात सामनामधून करण्यात आला आहे. पुढे सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे की, राज्यातील मिंधे सरकार हे दिल्लीचे वेठबिगार बनले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आदिवसी, गरीबांच्या वेठबिगारीचे दु:ख त्यांना काय समजणार? त्यांनी राज्याला दिल्लीचे वेठबिगार करण्याचे कंत्राट घेतले आहे, हे स्पष्टच दिसते. अशी टीका सामनाच्या संपादकीयमधून करण्यात आली आहे.