Ajit Pawar : आम्हाला कळंत ना.. आम्ही गोट्या खेळायला आलोय! अजित पवारांचा संताप, नेमकं कशावरून भडकले?
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी करताच उपमुख्यमंत्री अजित पवार भडकले. पैशाचं सोंग करता येत नाही, असं विधान त्यांनी केलं. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान, परांड्यामध्ये एका शेतकऱ्याने कर्जमाफीबद्दल विचारताच अजित पवार संतप्त झाले. आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?, असा सवाल त्यांनी केला. अजित पवारांच्या या प्रतिक्रियेमुळे वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. निवडणुकीच्या काळात महायुतीने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. सध्या महायुतीचे सरकार सत्तेत असून अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. असे असतानाही कर्जमाफी मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.
यावेळी लाडक्या बहिणींना ४५ हजार कोटी रुपये देतो, असे अजित पवार म्हणाले. मात्र, लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या दीड हजार रुपयांच्या मदतीने त्यांचे जीवनमान सुधारणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी अजित पवार यांनी असंवेदनशील वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. शेतकऱ्यांनी सरकारला निवडणुकीत साथ दिली, त्यामुळे आता सरकारनेही शेतकऱ्यांना मदत करणे अपेक्षित आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
