Devendra Fadnavis | अमरावती, मालेगावची घटना हा ‘प्रयोग’, देशात अराजक माजवण्याचा डाव – फडणवीस

| Updated on: Nov 16, 2021 | 6:38 PM

दु:खद बाब ही की देशाचे एक मोठे नेते राहुल गांधी यांना सर्व माहिती असूनही 8 नोव्हेंबरला ते ट्विट करतात की, त्रिपुरात खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अत्याचार होतोय. लगेच 11 नोव्हेंबरला नांदेड, अमरावती, मालेगावात मुस्लिमांचे मोठे मोर्चे निघतात. एकाच वेळी वेगवेगळ्या शहरात हे कसं घडू शकतं. हे सर्व राज्य सरकारच्या समर्थनातून निघालेले मोर्चे आहेत, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय.

Follow us on

अमरावती, नांदेड आणि मालेगावातील हिंसाचार, राज्यात सामुहिक बलात्काराच्या वाढत्या घटना, दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, वसुली आणि भ्रष्टाचाराचे आरोप या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य उरले नाही तर ‘काय दे’चे राज्य सुरु असल्याचा घणाघात त्यांनी केलाय. मुंबईत आज भाजप कार्यकारिणीची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलाय.

नांदेड, अमरावती, मालेगावात घडलेली घटना साधी मानू नका. हा एक प्रयोग आहे. देशात अराजक निर्माण करण्यासाठी, केंद्र सरकारविरोधात विचारपूर्वक केलेला प्रयोग आहे. 26 ऑक्टोबरला बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार होतात. त्याचा निषेध म्हणून त्रिपुरात मोर्चा निघतो. 28 ऑक्टोबरला सोशल मीडियावर पोस्ट पसरवल्या जातात. तेव्हा मशिदीचा फोटो टाकला जातो. दिल्लीतील एका रेफ्युजी कँपला लागलेल्या आगीचा फोटो दाखवून त्रिपुरात कुराण जाळण्यात आल्याचं सांगितलं जातं. जुन्या मिरवणुकीचे फोटो दाखवून हिंदू मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अन्याय करत असल्याचा आरोप केला जातो. दु:खद बाब ही की देशाचे एक मोठे नेते राहुल गांधी यांना सर्व माहिती असूनही 8 नोव्हेंबरला ते ट्विट करतात की, त्रिपुरात खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अत्याचार होतोय. लगेच 11 नोव्हेंबरला नांदेड, अमरावती, मालेगावात मुस्लिमांचे मोठे मोर्चे निघतात. एकाच वेळी वेगवेगळ्या शहरात हे कसं घडू शकतं. हे सर्व राज्य सरकारच्या समर्थनातून निघालेले मोर्चे आहेत, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय.