Devendra Fadnavis | जात प्रमाणपत्र मागितलं की मिळतं!; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर फडणवीसांचं मोठं विधान
राज्यातील मराठा आरक्षण, जात प्रमाणपत्र वितरण आणि नागपूरमधील पूरस्थिती या मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
राज्यातील मराठा आरक्षण, जात प्रमाणपत्र वितरण आणि नागपूरमधील पूरस्थिती या मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
मराठा समाजाच्या जात प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या पात्र नागरिकांना प्रमाणपत्र दिले जात असून, प्रलंबित अर्जांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. “कोणी अर्ज करूनही त्याला प्रमाणपत्र मिळत नाही, अशी परिस्थिती नाही. मराठा समाजासाठी आमच्या सरकारने घेतलेले निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी यापूर्वी कोणत्याही सरकारने केलेली नाही,” असे ते म्हणाले. कोणाला काही अडचणी किंवा नाराजी असल्यास त्यावर चर्चेतून मार्ग काढता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नागपूरमधील पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीवरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले. नागपूरसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून, संध्याकाळनंतर मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रशासनाशी सातत्याने संपर्क असून, आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने विद्यमान पाणी निचरा व्यवस्था ताणली जात आहे. “15 दिवस किंवा महिनाभराचा पाऊस एका दिवसात पडत असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. भविष्यात अशा अतिवृष्टीचा विचार करून पायाभूत सुविधांमध्ये बदल करण्याची गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले.
शहरातील काही भागांमध्ये पाणी निचऱ्याची कामे सुरू असून, काही प्रकल्प अद्याप अपूर्ण असल्याने काही ठिकाणी पाणी साचल्याचे त्यांनी सांगितले. एक ते सव्वा तासात 100 ते 125 मिमी पाऊस झाल्यास कोणतीही यंत्रणा अडचणीत येऊ शकते, असे सांगत त्यांनी पालघरसह इतर भागांतील अतिवृष्टीचाही उल्लेख केला. परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
