Disha Salian Case Update | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर तपास CBIकडे, आता सत्याचा शोध लागणार?
दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज, 2 सप्टेंबर 2026 रोजी महत्त्वाचा आदेश दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात CBIकडे सोपवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी मुलीच्या मृत्यूच्या तपासात गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप करत नव्याने चौकशी आणि एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती.
सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज, 2 सप्टेंबर 2026 रोजी महत्त्वाचा आदेश दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात CBIकडे सोपवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी मुलीच्या मृत्यूच्या तपासात गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप करत नव्याने चौकशी आणि एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. या याचिकेवरील सर्व पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. अखेर आज न्यायालयाने तपास CBIकडे सोपवण्याचा आदेश दिला. या आदेशानंतर सतीश सालियन यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. तपासादरम्यान कोणालाही थेट आरोपी म्हणून वागणूक देऊ नये, संबंधितांचे जबाब नोंदवावेत, तपास पूर्ण करून योग्य निष्कर्ष काढावा आणि त्यानंतर आरोपपत्र दाखल करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
दिशा सालियन यांचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. त्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या माजी मॅनेजर होत्या. दिशांच्या मृत्यूनंतर अवघ्या काही दिवसांनी, 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे दोन्ही घटनांमध्ये संबंध असल्याचे विविध दावे आणि चर्चा त्यावेळी मोठ्या प्रमाणावर झाल्या होत्या. मुंबई पोलिसांनी दिशांच्या मृत्यूप्रकरणी Accidental Death Report म्हणजेच ADR नोंदवून तपास केला होता. पोलिसांच्या तपासानुसार हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सतीश सालियन यांनी या निष्कर्षावर प्रश्न उपस्थित करत आपल्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप केला आणि प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची मागणी केली.
या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांच्या तपासाच्या पद्धतीवरही काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. कुटुंबीयांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त करून तक्रार केली असताना एफआयआर का नोंदवण्यात आला नाही, असा सवाल न्यायालयाने पोलिसांना केला होता. तसेच ADR आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रत कुटुंबीयांना इतक्या वर्षांनंतरही का देण्यात आली नाही, याबाबतही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले होते. दिशा चौदाव्या मजल्यावरून पडल्याचा पोलिसांचा दावा आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमधील जखमांची माहिती यामध्ये ताळमेळ कसा बसतो, याचे स्पष्टीकरणही न्यायालयाने मागितले होते.
दरम्यान, दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी आपल्याविरोधात कोणतीही तक्रार नसतानाही राजकीय हेतूने आपले नाव या प्रकरणात गोवले जात असल्याचा युक्तिवाद शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला होता. सर्व पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने सतीश सालियन यांच्या याचिकेवरील निकाल राखून ठेवला होता. आता न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा पुढील तपास CBIकडून केला जाणार आहे. त्यामुळे दिशा सालियन यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय होते आणि तपासादरम्यान उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांचे काय निष्कर्ष निघतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
