Tejasvee Ghosalkar : वेदनेतून घेतलेला निर्णय… तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण

Tejasvee Ghosalkar : वेदनेतून घेतलेला निर्णय… तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण

| Updated on: Dec 15, 2025 | 2:19 PM

अभिषेकच्या हत्येमुळे मिळालेल्या वेदनेतून आणि प्रभागातील विकासकामांसाठी तेजस्वी घोसाळकर यांनी राजकीय निर्णय घेतला आहे. न्याय मिळवण्यासाठी आणि विकास साधण्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या राजकीय पक्षांतराच्या निर्णयामागील भावनिक आणि विकासात्मक कारणे उघड केली आहेत. 2017 मध्ये शिवसेनेतून नगरसेविका बनलेल्या घोसाळकर यांना अभिषेकने समाजकारणात आणले होते. दुर्दैवाने, दोन वर्षांपूर्वी अभिषेकची निर्घृण हत्या झाली. या घटनेनंतरही त्यांनी समाजकार्य सुरू ठेवले, मात्र प्रभागातील विकासकामे अपुरी राहत असल्याने आणि लोकांशी संबंधित कामे होत नसल्याने त्यांना अस्वस्थता जाणवत होती. अभिषेकच्या हत्येची केस उच्च न्यायालयात आणि नंतर सीबीआयमध्ये अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

याच पार्श्वभूमीवर तेजस्वी घोसाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सीबीआय तपासाला गती देऊन अभिषेकला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच प्रभागातील विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी त्यांना संधी मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ठाकरे कुटुंबियांशी आपले ऋणानुबंध कायम राहतील आणि त्यांना सोडणे कठीण होते, कारण ते एक कुटुंब होते असे त्यांनी सांगितले. मात्र, काही कठीण परिस्थितीमुळे आणि वेदनेतून हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काम करत असताना कोणतेही अडथळे किंवा दबाव नसल्याचेही त्यांनी नमूद केले. तेजस्वी घोसाळकर यांच्या निर्णयाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Published on: Dec 15, 2025 02:19 PM