नवी दिल्लीः बीएमसीवर (BMC Election) सत्ता मिळवणे हाच भाजपाचा हेतू आहे. एकदा मुंबई महापालिका भाजपाच्या (BJP) हातात आल्यावर त्यांच्यासमोर दुसरे कोणतेही मोठे आव्हान नाही. त्यानंतर शिंदे गटाला ते कुठे सोडून देतील कळणारही नाही, असा घणाघात एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. हा माझा अंदाज खरा ठरणार असून तुम्ही आजच हे रेकॉर्ड करून ठेवा, असे वक्तव्यही खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी केले आहे. भाजपावर टीका करताना खा. जलील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही चौफेर टीका केली आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एमआयएमने यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत या विषयावर झालेल्या बैठकीला खा. जलील हजर होते.