मुंबई : नवी मुंबईतील खारघर येथे16 एप्रिल 2023 ला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याला गालबोट लागले. कार्यक्रमस्थळी काही लोकांचा मृत्यू झाला. तर काहींचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. तसेच खारघर दुर्घटनेत 50 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा राऊत यांनी केला. तर हा आकडा सरकार लपवत आहे, असा गंभीर आरोप केला होता. त्यावरून शिंदे यांची शिवसेना आता आक्रमक झाली असून शिवसेना नेते किरण पावसकर यांनी राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर त्याविषयी त्यांनी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात जात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कोठे जातं हे पहावं लागणार आहे.