Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!
नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका कार्यक्रम पत्रिकेवरून निर्माण झालेला वाद आता अधिकच चिघळताना दिसत आहे. कार्यक्रम पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्यामुळे शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत गोंधळ घातला होता. या वादात आता भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका कार्यक्रम पत्रिकेवरून निर्माण झालेला वाद आता अधिकच चिघळताना दिसत आहे. कार्यक्रम पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्यामुळे शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत गोंधळ घातला होता. या वादात आता भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना मंदा म्हात्रे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागे हेतुपुरस्सर राजकारण झाल्याचा आरोप केला. “मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी निधी मंजुरीबाबत कोणतीही भूमिका नसल्याचे सांगितले. त्यामुळे ही निमंत्रणपत्रिका जाणूनबुजून तयार करण्यात आली असावी. मला राजकीय त्रास देण्याचा हा प्रयत्न असू शकतो,” असे त्या म्हणाल्या.
म्हात्रे यांनी कार्यक्रमस्थळी धक्काबुक्की झाल्याचाही आरोप केला. “मी कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र तिथे गणेश नाईक समर्थक नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवकांनी माझ्यासोबत धक्काबुक्की केली,” असा दावा त्यांनी केला.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्यामागील कारणांवरही भाष्य केले. “मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तब्बल 17 वर्षे काम केले. पक्षाची पहिली महिला आघाडी अध्यक्षा होते. मात्र गणेश नाईक राष्ट्रवादीत आल्यानंतर माझ्यावर अन्याय होऊ लागला आणि अखेर मला पक्ष सोडावा लागला,” असा आरोप त्यांनी केला.
भाजपमध्ये प्रवेशाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “देवेंद्र फडणवीस यांनी मला अन्याय सहन करू नका, आमच्याकडे या असे सांगितले होते. त्यानंतर मी भाजपमध्ये आले. मात्र आजही मला त्रास दिला जात आहे.”
तसेच गणेश नाईक यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले की, “गणेश नाईक भाजपमध्ये आले नसते तर ते मंत्री झाले असते का? ते बोलतात एक आणि करतात दुसरे. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून नियोजनबद्ध पद्धतीने वातावरण तयार केले जाते.”
दरम्यान, मंदा म्हात्रे यांनी केलेल्या या आरोपांनंतर नवी मुंबईतील भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला असून, यावर वनमंत्री गणेश नाईक काय भूमिका मांडतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.