29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी अपडेट
सरकारी शिष्टमंडळाशी चर्चा होऊनही मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. कुणबी प्रमाणपत्र, व्हॅलिडिटी आणि जुन्या जीआरच्या अंमलबजावणीसह अनेक मागण्या त्यांनी सरकारसमोर ठेवल्या. २८ ऑगस्टपर्यंत प्रलंबित अर्ज घेऊन अंतरवाली सराटी येथे येण्याचे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची सरकारी शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, शंभूराजे देसाई आणि आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. शिष्टमंडळासोबत विस्तृत चर्चा होऊनही जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी नियोजित उपोषण सुरु ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या भेटीदरम्यान जरांगे पाटील यांनी सरकारसमोर मराठा समाजाच्या अनेक प्रमुख मागण्या मांडल्या. ५८ लाख कुणबी नोंदींना तातडीने प्रमाणपत्र देणे, प्रलंबित व्हॅलिडिटी अर्ज मार्गी लावणे, हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी देणे या प्रमुख मागण्या होत्या.
तसेच, मराठा आंदोलनावरील गुन्हे मागे घेणे, ईडब्ल्यूएस आणि ईएसबीसीमधील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देणे, बलिदान दिलेल्या मराठा बांधवांना आर्थिक मदत व नोकरी देणे, आणि सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे, बॉम्बे गव्हर्न्मेंट गॅझेट इअरनुसार नवीन जीआर काढणे यावरही चर्चा झाली. जरांगे पाटील यांनी २८ ऑगस्ट रोजी सर्व प्रलंबित अर्ज घेऊन अंतरवाली सराटी येथे जमण्याचे आवाहन मराठा समाजाला केले आहे. हे आंदोलन निर्णायक असल्याचे त्यांनी सांगितले असून, मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
