Latur | मराठा आरक्षणाच्या मागणीने लातूरमध्ये तणाव! जरांगेंच्या एका फोननंतर नेमकं काय घडलं?
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवरून मराठवाड्यातील वातावरण तापले असताना लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाणा येथे सुनील बिरादार या तरुणाने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर लातूरसह काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवरून मराठवाड्यातील वातावरण तापले असताना लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाणा येथे सुनील बिरादार या तरुणाने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर लातूरसह काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
लातूर जिल्ह्यातील येरोळमोड येथे सुनील बिरादार यांचा मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलकांनी रास्ता रोको केला. या आंदोलनादरम्यान परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांशी फोनवरून संवाद साधला. “आपल्या भावाची हेळसांड करू नका, त्याच्या कुटुंबाला नोकरी आणि आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू,” असे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले.
दरम्यान, सुनील बिरादार यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी प्रमुख मागणी आंदोलकांकडून करण्यात आली होती. उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर तसेच जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संवाद झाल्यानंतर रात्री उशिरा येरोळमोड येथील रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. “कोणीही रास्ता रोको करू नका, टायर जाळण्यासारखे प्रकार करू नका,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सुनील बिरादार यांच्यावर आज त्यांच्या सुमठाणा या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलन आणखी संवेदनशील बनले असून, मनोज जरांगे पाटील मुंबईकडे धडक देण्याच्या तयारीत असताना लातूरमधील या घटनेनंतर प्रशासनासमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
