दादा मी येतोय; प्रसाद लाडांची जरांगेंना भावनिक साद, आता तोडगा निघणार का?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. भर उन्हात उपोषण करण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम असल्याने सरकारकडून तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. भर उन्हात उपोषण करण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम असल्याने सरकारकडून तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
मराठा आरक्षणासंदर्भात निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असून चर्चेतून काही सकारात्मक तोडगा निघणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, भाजप आमदार प्रसाद लाड आणि आमदार बच्चू कडू हे आज अंतरवाली सराटीत दाखल होणार आहेत. उपोषण सुरू होण्यापूर्वी संवादातून मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, या भेटीपूर्वी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून भावनिक संदेश दिला आहे. “दादा मी येतोय… शब्द पाळायला येतोय,” असं म्हणत त्यांनी जरांगे पाटील यांनी भर उन्हात स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असं आवाहन केलं. प्रसाद लाड यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, “मी आणि विखे पाटील साहेब आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी येत आहोत. मराठा समाजाला तुमची गरज आहे. त्यामुळे उन्हात स्वतःला त्रास करून घेऊ नका,” अशी भावनिक साद त्यांनी घातली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्य सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं असून आता सरकार आणि आंदोलकांमधील चर्चेतून नेमका काय तोडगा निघतो, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
