एकीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि दुसरीकडे शिवसेना आमदार सुहास कांदे ! पूरग्रस्तांच्या मदतीवरुन दोघांमध्ये झालेल्या या खडाजंगीवर आज पडदा पडला. काल कॅमेऱ्यासमोर झालेल्या जाहीर बाचाबाचीनंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आणि मदतीच्या निकषासंदर्भात एकमत झाल्यानंतर वादाला पूर्णविराम दिला गेला.
पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात आणि खासकरुन नांदगावमध्ये पुरानं मोठं नुकसान केलंय. त्यासाठी पालकमंत्र्यांच्या अखत्यारितला आप्तकालीन निधी देण्याची मागणी शिवसेना आमदार सुहास कांदेंनी केली. यावर हा अधिकार पालकमंत्र्यांचा आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेअंती निर्णय होईल, असं भुजबळांनी सांगताच दोघांमध्ये वाट पेटला.