नागपूर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. ओबीसींना आरक्षण न मिळण्यास भाजपच जबाबदार आहे, असा आरोप करतानाच केंद्र सरकारने तातडीने इम्पिरिकल डेटा द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. राज्य सरकारने मागास आयोग तयार करावा. त्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा तयार करावा आणि पुन्हा कोर्टात यावे, असा सर्वोच्च न्यायालयानेच आदेश दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांच्याकडील डेटा आम्हाला द्यावा. तो कोर्टात दिल्यास ओबीसींना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असं नाना पटोले यांनी सांगितलं.