Nashik News | चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण; आज मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोकोची हाक
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, काल सायंकाळी 3 ते 4 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावल्याची माहिती समोर आली.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, काल सायंकाळी 3 ते 4 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावल्याची माहिती समोर आली. संबंधितांवर तत्काळ औषधोपचार करण्यात आले. उपोषणाचा कालावधी वाढत असल्याने आंदोलनकर्त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, चार दिवस उलटूनही कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने साधी विचारपूस केलेली नाही. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना वाढली आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी आज मुंबई-आग्रा महामार्गावर गळ्यात कांद्याच्या माळा घालून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आता प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
