Nashik Crime : गुंडांची धुलाई अन् नाशिकची सफाई… काढा दंडा, भयमुक्त नाशिकचा अजेंडा, गुंडागर्दीविरोधात पोलिसांची मोहीम काय?
नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. राजकीय आश्रयाखाली वावरणाऱ्या गुंडांनाही आता सोडले जात नाहीये. मंत्री गिरीश महाजन यांनी या कारवाईला पाठिंबा दिला असून, भयमुक्त नाशिक हेच आपले उद्दिष्ट असल्याचे म्हटले आहे. सामान्य नागरिकही पोलिसांच्या या मोहिमेला साथ देत आहेत.
नाशिक शहर गुन्हेगारीमुक्त करण्याच्या दिशेने पोलिसांनी कडक पाऊले उचलली आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांची पोलिसांनी धुलाई सुरू केली आहे. राजकारण्यांचा अभय असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरू झाली आहे. खुद्द मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील गुंडांना जास्त माज आल्याचे म्हटले असून, गुंडगिरी करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही असे स्पष्ट केले आहे.
नाशिकमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीमध्ये गोळीबार, अपहरण, जमिनी बळकावणे, ड्रग्सचा वापर आणि किरकोळ वादातून होणारे खून यांसारख्या घटनांचा समावेश आहे. काही प्रकरणांमध्ये राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांचाही समावेश आढळला आहे, जसे की भाजप नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी भयमुक्त नाशिक हेच उद्दिष्ट ठेवले असून, नागरिकही या मोहिमेला पाठिंबा देत आहेत. मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री असल्याने अशा गुंडगिरीला थारा मिळणार नाही, असे आश्वासनही देण्यात आले आहे.
