…तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची जोरदार टीका

| Updated on: Mar 28, 2024 | 10:23 PM

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपात जायची वेळी आली तर पहिली उडी सुनील तटकरे मारतील अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहीत पवार यांनी केली आहे. या टीकेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Follow us on

पुणे : अजितदादांच्या गटातून जर भाजपात जायची वेळ आली तर पहिली उडी सुनील तटकरे मारतील अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहीत पवार यांनी केली आहे. तर त्यांच्या टीकेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या बालबुद्धी विचारांकडे आपण फारसे लक्ष देत नाही, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्यांनी मला राजकारण शिकवू नये असेही सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे शेकापचे नेते जयंत पाटील यांनी देखील सुनील तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचे म्हटले आहे. तर त्यावर सुनील तटकरे यांनी त्यांच्या पक्षाला लागलेली घरघर थांबायची असेल तर त्यांना अशी वक्तव्य करावे लागतात असे म्हटले आहे. साल 2019 च्या लोकसभा निवडणूकीत सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा पराभव केला होता. रायगड मतदार संघातून अनंत गीते यांचा तटकरे यांनी 31,438 मतांनी पराभव केला होता. शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या श्रीवर्धन आणि अलिबाग येतील मतांनी तटकरे यांचा विजय झाला होता. आता बदलत्या राजकीय परिस्थितीत शेकापचे जयंत पाटील अनंत गीते यांच्या बाजूने आहेत.