पूराचं संकट! 2 लाखांहून अधिक लोकांना फटका, बचावकार्य सुरु
ओडिशामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत असून हजारो कुटुंबांवर संकट ओढावले आहे. प्रशासनाकडून बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.
ओडिशामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत असून हजारो कुटुंबांवर संकट ओढावले आहे. प्रशासनाकडून बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 2 लाखांहून अधिक नागरिकांवर पुराचं संकट आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. केओंझार जिल्ह्यात पावसाशी संबंधित वेगवेगळ्या घटनांमध्ये एका वृद्धासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून नुकसानाचा आढावा घेतला जात आहे. बालासोर, भद्रक, जाजपूर, मयुरभंज आणि संबलपूरसह 6 जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक रस्ते आणि संपर्क व्यवस्था बाधित झाली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात जोरदार पाऊस आणि वादळी वारे कायम आहेत. त्यामुळे पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी 44 तालुक्यांतील 266 गावांना पुराचं संकट असल्याची माहिती दिली. तसेच मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
