मुंबई : कर्नाटक, गुजरात या राज्यांनतर आता महाराष्ट्रातदेखील कोरोनाचे नवे रुप अर्थात ओमिक्रॉन या विषाणूने शिरकाव केला आहे. डोंबिवलीत कोरोनाचा नवा रुग्ण आढळलाय. राज्यात हा पहिलाच रुग्ण आढळल्यामुळे सरकार तसेच प्रशासनाकडून कोणती खबरदारी घेण्यात येणार, लॉकडाऊन लागणार का, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आणखी वेगळी नियमावली लागू करण्याची गरज आहे का ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधत या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यांनी सध्यातरी कोणतेही निर्बंध लागू करण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. तसेच नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळावेत असे आवाहन त्यांनी केले आहे.