राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी परळीत आगमन झाले. कालचा मुक्काम झाल्यानंतर श्रींच्या पालखीचे अंबाजोगाईकडे (Ambejogai) प्रस्थान झाले आहे. या पालखीचे परळीच्या (Parali) भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. या दिंडीचे यंदा 53 वे वर्ष आहे. यात सातशे वारकरी सहभागी झाले आहेत. राम कृष्ण हरी, गण गण गणात बोते, संत ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषा बरोबरच टाळ-मृदुंगाने परिसर दुमदुमला आहे. हातात भगवा पताका, पांढरे शुभ्र वस्त्र आणि मुखात विठुरायाचे नामस्मरण करीत अतिशय शिस्तीत ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. ही दिंडी पाच जिल्ह्यातून जाणार असून तब्बल 750 किलोमीटरचे अंतर पार करून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचणार आहे. वारकऱ्यांचे पांढरे शुभ्र कपडे, अत्यंत शिस्तीत चालणारी पावलं अशी या दिंडीची ओळख आहे.