Raj Thackeray | आपण कुणाचे वारस आहोत, याचं स्मरण करा; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 353 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर विशेष पोस्ट करत शिवरायांना मानाचा मुजरा अर्पण केला आहे. शिवराज्याभिषेक दिन हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता देशभर राष्ट्रीय सणासारखा साजरा व्हावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 353 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर विशेष पोस्ट करत शिवरायांना मानाचा मुजरा अर्पण केला आहे. शिवराज्याभिषेक दिन हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता देशभर राष्ट्रीय सणासारखा साजरा व्हावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 6 जून 1674 रोजी झालेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारतीय इतिहासातील स्वाभिमानाचा आणि स्वराज्याच्या संकल्पनेचा सुवर्णक्षण होता. अनेक शतकांच्या परकीय आक्रमणांमुळे खचलेल्या समाजामध्ये स्वराज्याची प्रेरणा निर्माण करण्याचे महान कार्य शिवरायांनी केले. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेऊन त्यांनी स्वतंत्र राज्य उभारण्याचा ध्यास घेतला आणि त्यातून हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. राज ठाकरे यांनी शिवराज्याभिषेक दिनाची तुलना अमेरिकेच्या स्वातंत्र्य घोषणेशी आणि फ्रेंच राज्यक्रांतीशी करत, या घटनेने भारतीय इतिहासाची दिशा बदलल्याचे नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजवलेला स्वातंत्र्य आणि स्वराज्याचा विचार पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच मराठी जनतेने केवळ सजावट आणि मिरवणुकांपुरता हा दिवस मर्यादित न ठेवता, आपण शिवरायांचे वारसदार आहोत याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचे आचरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले. अखेरीस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा अर्पण केला.
