Raj Thackery | सावरकरांचा उदोउदो करणाऱ्यांनी खरंच सावरकर वाचले आहेत का?; राज ठाकरेंचा भाजपला खोचक टोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. सावरकरांच्या विचारांचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही लक्ष्य करत सावरकरांच्या नावाचा राजकारणासाठी वापर करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. सावरकरांच्या विचारांचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही लक्ष्य करत सावरकरांच्या नावाचा राजकारणासाठी वापर करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “सावरकर हे हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्त्वज्ज्ञ, समाजसुधारक आणि विज्ञाननिष्ठ विचारवंत होते. मात्र आज त्यांच्या नावाचा वापर फक्त राजकीय फायद्यासाठी केला जात आहे. सावरकरांचा उदोउदो करणाऱ्यांनी खरंच सावरकर वाचले आहेत का? त्यांचे विचार समजून घेतले आहेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील बदलत्या सामाजिक वातावरणावरही भाष्य केलं. “व्हॉट्सअॅप विद्यापीठातून येणाऱ्या माहितीवर कोणतीही पडताळणी न करता विश्वास ठेवण्याची स्पर्धा सुरू आहे. राजकारणी भोंदू बाबांच्या मागे लागले आहेत. सावरकरांनी तर्क, विज्ञान आणि सत्य यावर भर दिला, मात्र आज त्यांच्या नावाने समाजात तेढ निर्माण केली जात आहे,” अशी टीका त्यांनी केली.
तसेच, “ज्या महाराष्ट्रात सावरकरांनी जातिव्यवस्थेविरोधात लढा दिला, त्या महाराष्ट्रात आज जातींवरून संघर्ष वाढवला जात आहे. याला सत्ताधाऱ्यांकडून खतपाणी घातलं जात आहे,” असंही राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, “आपण कोण होतो आणि आपल्या परंपरेतील चांगल्या गोष्टी आत्मसात करून प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर तपासणं, हीच सावरकरांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असं सांगत राज ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केलं.
