Mumbai BMC Election : मोदी अन् EVM असल्यानं हे लोकं माज करताहेत, एकत्र या… राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र
राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र या, मुंबई वाचवा असा कानमंत्र दिला आहे. मोदी आणि ईव्हीएममुळे भाजपचा माज वाढल्याचे ते म्हणाले. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा कट असल्याचा आरोप करत, मराठी माणसांनी एकत्र येऊन मुंबईचे मराठीपण टिकवण्यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचा कानमंत्र दिला आहे. “संकट नीट ओळखा, मुंबई वाचली पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले. मोदी आणि ईव्हीएममुळे भाजपचा माज वाढल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला. या बैठकीत मनसे नेत्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या कथित कटावर चिंता व्यक्त केली.
तर बाळा नांदगावकर यांनी काही लोकांचे मुंबई वेगळी करण्याचे स्वप्न असल्याचे नमूद करत ते उद्ध्वस्त करण्याचे आवाहन केले. अविनाश जाधव यांनी भाजपवर मुंबईचा महापौर मराठी होऊ नये म्हणून उत्तर भारतीयांना जास्त तिकिटे दिल्याची टीका केली. मुंबईतील मराठी माणसाने आणि मुंबईवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने एकत्र येऊन मुंबईचे मराठीपण टिकवावे, अन्यथा भारतीय जनता पक्ष मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला.
