ज्याची भीती तेच… महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
रोहित पवारांनी बीएलओद्वारे मतदार यादीत अनियमितता केल्याचा आणि मतदारांना वगळण्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. तसेच, उच्च न्यायालयाच्या टायपिंग परीक्षेत सॉफ्टवेअर समस्येमुळे झालेल्या गोंधळाची चौकशी करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) नेते रोहित पवार यांनी मतदार नोंदणी प्रक्रिया आणि उच्च न्यायालयाच्या टायपिंग परीक्षेतील गोंधळावर तीव्र आक्षेप घेतले आहेत. निवडणूक आयोगाच्या एसआयआर मोहिमेतून सुमारे १.७६ कोटी मतदार वगळले जाणार असून, त्यांना फॉर्म क्रमांक सहा भरून पुन्हा नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, फॉर्म सहाचा गैरवापर करून निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात अनधिकृत मतदार वाढवले जात असल्याचा पवारांचा आरोप आहे. हा प्रकार बिहारमध्ये घडला असून असंच महाराष्ट्रात घडणार, अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे.
एकाच खोलीत हजारो मतदार दाखवल्याची उदाहरणे त्यांनी दिली. या प्रकारामुळे लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत पवारांनी व्यक्त केले. तसेच, उच्च न्यायालयाच्या टायपिंग परीक्षेत खासगी कंपनीने दिलेल्या केंद्रांवरील सॉफ्टवेअर बंद पडल्याने किंवा धीमे चालल्याने विद्यार्थ्यांना पेपर पूर्ण करता आला नाही. यामुळे छत्रपती संभाजीनगरसह अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलने केली. या सर्व गोंधळाची चौकशी करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी पवारांनी केली आहे.
