शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे… सुनावणीआधीच राऊत अचानक असं काय म्हणाले?
संविधान विकत घेतलं जातंय का, असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत सब सेट हो जाएगा अशी विधाने अमित शाह यांनी केल्याचा दावा राऊत यांनी केला. यामुळे न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास उडत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. हे विधान अनेक महत्त्वाच्या वृत्तपत्रांमध्येही छापून आल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक बड्या नेत्यावर भाष्य केले. तसेच त्यांनी केंद्रीय गृमंत्र्यांवर आरोपही केले. त्यांनी सांगितले की, सत्ताधारी पक्षाच्या आमदार-मंत्र्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत निर्माण झालेल्या चिंतेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सब सेट हो जाएगा, चिंता मत करो असे आश्वासन दिल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. याचा अर्थ देशाचे संविधान आणि सर्वोच्च न्यायालय विकत घेतले जात आहे का, असा प्रश्न निर्माण करतात, असे राऊत म्हणाले.
राऊत यांच्या म्हणण्यानुसार, शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत अस्वस्थ होते. त्यावेळी अमित शाह यांनी त्यांना धीर दिला. हा संवाद काही महत्त्वाच्या वृत्तपत्रांमध्येही छापून आल्याचे राऊत यांनी नमूद केले. यापूर्वीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले असताना असेच आश्वासन मिळाले होते. देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर आणि शिंदे गट देखील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्यांच्याच बाजूने लागेल असे म्हणत असल्याने राऊत यांनी यावर चिंता व्यक्त केली. न्यायव्यवस्थेवर अशाप्रकारे राजकीय भाष्य केल्याने लोकांचा विश्वास कमी होत असून, ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणणे आपले कर्तव्य असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. यतो धर्मस्ततो जयः असे म्हणत त्यांनी सत्याच्या विजयावर विश्वास व्यक्त केला.
