ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावले नसल्याचं लेखी उत्तर केंद्र सरकारने दिलं आहे. सरकारच्या या उत्तरावर शिवसेना नेते संजय राऊत प्रचंड संतापले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू झाले नाहीत, असं केंद्र सरकारने लेखी उत्तरात म्हटलं आहे. हे तुम्हाला पटतं का?, असा सवाल राऊत यांना केला. त्यावर राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. तुमचाही खरोखरच विश्वास बसतोय का हे आधी विचारलं पाहिजे. ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजन अभावी मेले, जे मेडिकल सिलिंडरसाठी इकडे तिकडे हिंडत होते, त्यांचा विश्वास बसतोय का हे सांगायला हवं. सरकार खोटं बोलत आहे, असं संजय राऊत म्हणाले.