मुंबई: एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकल्याने त्यावरून तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. हिंदू महासंघाने (hindu maha sangh) तर औरंगजेबाची कबर हवीच कशाला? असा सवाल करत औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनीही ओवैसींवर टीका केली आहे. हे रितीरिवाज नाहीत. वारंवार औरंगाबादला यायचे आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे. अशातून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करायची असे काहीतरी ओवेसी बंधू यांना करायचे आहे. पण मी आज इतकेच सांगेन की ज्या औरंगजेबाच्या कबरी पुढे तुम्ही आज नमाज पढत आहात, त्या औरंगजेबाला कबरीमध्ये मराठ्यांनी टाकले आहे. कधीतरी तुम्हाला देखील त्याच कबरीमध्ये जावे लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. राऊत मीडियाशी संवाद साधत होते.