Sanjay Raut | जयंत पाटील, आव्हाड हे फ्री बर्ड्स… एकनाथ शिंदेच्या भेटीवर राऊतांचा खोचक टोला
काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) एनडीएच्या जवळ जात असल्याच्या चर्चा रंगल्या. या चर्चा सुरू असतानाच जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन निवासस्थानी भेट घेतली. या सलग भेटींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे नेते जयंत पाटील यांच्या सलग राजकीय भेटींमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया देत विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) एनडीएच्या जवळ जात असल्याच्या चर्चा रंगल्या. या चर्चा सुरू असतानाच जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन निवासस्थानी भेट घेतली. या सलग भेटींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी या भेटींना राजकीय रंग देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “आज जयंत पाटील किंवा जितेंद्र आव्हाड यांनी एखाद्या नेत्याची भेट घेतली म्हणून ते त्या पक्षात जाणार, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. उद्या त्यांनी रामदास आठवले यांची भेट घेतली, तर ते त्यांच्या पक्षात जात आहेत असे म्हणणार का?”
राऊत पुढे म्हणाले की, “देशात आणि राज्यात विविध पक्षांचे नेते एकमेकांना भेटत असतात. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे पक्षाचे वरिष्ठ नेते असून, ते विविध नेत्यांच्या भेटी घेत असतात. त्यातून कोणतेही राजकीय निष्कर्ष काढण्याचे कारण नाही.” दरम्यान, ठाकरे गटाकडून नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या रामरक्षा आंदोलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी टीका करत हा “राजकीय विनोद” असल्याची प्रतिक्रिया दिली होती.
या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री हे केवळ एका पक्षाचे नसून संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात. आम्ही २५ वर्षे भाजपसोबत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केले आहे. राजकीय मार्ग वेगळे झाले म्हणून वैयक्तिक संबंध संपत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणे हा मूर्खपणा आहे.” दरम्यान, जयंत पाटील यांच्या सलग राजकीय भेटी आणि त्यावर संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना पुन्हा उधाण आले असून, आगामी काळात या घडामोडी कोणते वळण घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
