Sanjay Raut | 20 जुलै हा ब्लॅक डे! जालियनवाला बागची आठवण करून देत संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध करत त्यांनी हा दिवस भारतीय लोकशाहीसाठी "काळा दिवस" असल्याचे म्हटले आहे.
दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध करत त्यांनी हा दिवस भारतीय लोकशाहीसाठी “काळा दिवस” असल्याचे म्हटले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “काल देशाच्या युवा शक्तीने आपल्या भावना आणि संताप लोकशाही मार्गाने व्यक्त केला. मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या सरकारने तसेच पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या तरुण-तरुणींवर अमानुष लाठीचार्ज केला, अश्रुधुराचा वापर केला आणि आंदोलकांना फरफटत नेले. अनेकांचे डोके फोडण्यात आले.”
राऊत यांनी पुढे या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी करत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. “ही दृश्ये पाहून जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली. देशातील पालक आणि विद्यार्थ्यांच्या भावना सरकारला समजत नाहीत,” अशी टीका त्यांनी केली.
तसेच, २० जुलै हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील “ब्लॅक डे” असल्याचे सांगत, हा दिवस पुढे “डरपोक दिवस” म्हणून ओळखला जावा, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
दरम्यान, दिल्लीतील आंदोलनानंतर राजकीय वातावरण अधिक तापले असून, आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत.
