शिंदे फडणवीस सरकारचा आजचा होणारा मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलण्यात आलेला आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सुरु असलेल्या न्यायालयाच्या निर्णयानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालयाच्या सुनावणीनंतरच खातेवाटप होणार असल्याचे दिसते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल रात्री उशिरा दिल्लीवरून मुंबईत दाखल झाले. दिल्लीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. गृहखातं भाजपकडे तसेच 60 टक्के मंत्रिपद भाजपाकडे आणि उर्वरित 40 टक्के शिंदे गटाकडे राहाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या म्हणजे मंत्रिमंडळाच्या याद्या निश्चित होत असतात अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसकर यांनी दिली आहे. तर दुसरीकडे 15 ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चित होणार असे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.