मुंबई – कालच पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल (लागला. त्यानंतर राज्यातल्या आणि देशातल्या भाजप नेत्यांचा कॉन्फिडन्स वाढलाय. कालपासून भाजप नेत्यांनी ये तो सिर्फ झाकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं, म्हणायला सुरूवात केलीय. मात्र त्यांना आता जयंत पाटील यांनी इशारा दिलाय. उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणे चुकीचे असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना भाजपला लगावला आहे. उत्तर प्रदेशात मायावतींना मतं अधिक पडली आहेत. सर्व पक्ष उत्तरप्रदेशमध्ये एकवटले असते तर विजय झाला असता असा दावा करतानाच भाजपच्या हातातूनही अनेक राज्य गेली होती याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन दिली. त्यामुळे निवडणुका जरी इतर पाच राज्यात पार पडल्या असल्या तरी राज्यातलं वातावरण तापलंय.