आम्ही आहोत म्हणून सरकार आहे, या काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या विधानावर शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता? असा सवाल खासदार हेमंत पाटील यांनी चव्हाण यांना केला आहे. हेमंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसले असते तर तुम्ही कुठे असता? असा सवाल करत आम्ही आहोत म्हणून सरकार आहे असा कुणीही गर्व करु नये, अशी टीका पाटील यांनी केली.
महाविकास आघाडीमध्ये आमच शंभर टक्के नुकसान होत आहे. आमचा वापर केला जात असल्याची खंतही पाटील यांनी व्यक्त केली आहे. आपला वापर होत असल्याच्या बाबी वरिष्ठांच्या कानावर घातल्या आहेत. केवळ उद्धव ठाकरे यांचे आदेश आहेत म्हणून सगळ सहन करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
अशोक चव्हाण यांनी एक महत्त्वाचं विधान केलं होतं. आम्ही आहोत म्हणून सरकार आहे, असं ते म्हणाले होते. आम्ही महत्वाचा पक्ष म्हणून आमचे समर्थन महत्वाचे आहे. मुख्यमंत्र्यांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. काँग्रेस आशावादी आहे, मुख्यमंत्र्यान्वर पूर्ण विश्वास आहे, तिन्ही पक्ष चांगले काम करत आहे, असे चव्हाण म्हणाले होते. कॉंग्रेसचेही समर्थन महत्वाचे आहे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांना सत्तेत सामील पक्षांना काही संदेश द्यायचाय हे या वक्तव्यावरून दिसत असतानाच पाटील यांनी त्यावर पलटवार केला आहे.