पुणे: इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर आता लगेचच इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे. त्यासाठी येत्या 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणीस सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.
अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. 19 जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. दरवर्षी दहावीतील गुणांच्या आधारे अकरावीची प्रवेश प्रक्रिया होते. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यायची आहे की नाही एवढेच संकेतस्थळावर जाऊन स्पष्ट करायचे आहे, असंही पाटील यांनी सांगितलं.