Sunil Tatkare UNCUT | सुनेत्रा पवार नाराज? वर्षा बंगल्यावर नेमकं काय घडलं?; अखेर सुनील तटकरे यांनीच दिलं मोठं स्पष्टीकरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतल्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्याचवेळी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटीलही वर्षा बंगल्यावर उपस्थित असल्याच्या चर्चांमुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यतांवर तर्कवितर्क सुरू झाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या भेटीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अखेर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. ही भेट पूर्णपणे विकासकामांच्या संदर्भातील होती, राजकीय नव्हती, असे स्पष्ट करत त्यांनी सुनेत्रा पवार नाराज असल्याच्या चर्चाही फेटाळून लावल्या. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतल्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्याचवेळी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटीलही वर्षा बंगल्यावर उपस्थित असल्याच्या चर्चांमुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यतांवर तर्कवितर्क सुरू झाले होते.
यावर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले की, जयंत पाटील आणि आमची वर्षा बंगल्यावर कोणतीही संयुक्त बैठक झाली नव्हती. जयंत पाटील हे त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील अपात्र नगराध्यक्षांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले होते, असे त्यांनी सांगितले. तटकरे पुढे म्हणाले की, आपण आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ यापूर्वीच मागितली होती. संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामे, केंद्र सरकारकडे पाठवायचे प्रस्ताव आणि विविध प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यासाठी ही भेट झाली होती. दापोली पर्यटन प्रकल्पासह काही महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उपलब्ध असल्याने त्यांनी आम्हाला बोलावले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुनेत्रा पवार नाराज असल्याच्या चर्चांवर बोलताना तटकरे म्हणाले की, “जर ही राजकीय बैठक असती तर त्याची माहिती निश्चितच सुनेत्रा पवार यांना दिली गेली असती. मात्र ही भेट राजकीय नव्हती.” काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मुख्यमंत्री भेटीबाबतची संपूर्ण माहिती देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल आदर व्यक्त करत तटकरे म्हणाले की, “जसा आदर आमच्या मनात अजितदादांबद्दल आहे, तसाच आदर सुनेत्रा वहिनींबद्दलही आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षमपणे पुढे जात आहे.”
दरम्यान, सुनील तटकरे यांच्या या स्पष्टीकरणानंतर वर्षा बंगल्यावरील भेटीभोवती सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता कोणते नवे वळण मिळते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.