महाराष्ट्रात अखेर बैलगाडा शर्यतींना (Bullock Cart Race) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सशर्त परवानगी दिली आहे. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत असून बैलगाडा मालकांमध्ये उत्साह संचारला आहे. कुठे फटाक्यांच्या आतषबाजीने तर कुठे ढोल ताशाच्या गजरात ‘सर्जा-राजा’च्या पुनरागमनाचं स्वागत होत आहे. महाराष्ट्रात या खेळाला शंकरपट (Shankarpat) म्हणूनही ओळखलं जातं. कर्नाटकात कंबाला (Kambala), तामिळनाडूत रेकला (Rekla), तर पंजाबमध्ये बौलदा दी दौड (baulda di daud) या नावाने ही शर्यत ओळखली जाते. याशिवाय मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही बैलगाडा शर्यती खेळल्या जातात. 18-19 व्या शतकात भारतातील ग्रामीण भागात दळणवळणासाठी बैलगाडीचा वापर केला जात असे. बैलांचा प्रजोत्पादनासाठी मर्यादित राहिलेला वापर पुढे सामान, कृषी उत्पादन आणि मानवी वाहतुकीसाठीही होऊ लागला.