महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केलीय. त्यावरुन भाजप नेत्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवायला सुरुवात केलीय. अशावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न एका महिन्यात सोडवण्याचं आश्वासन वडेट्टीवार यांनी दिलंय. पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि दु:खद आहे. मी त्या वडिलांशी बोललो. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलणार आहोत. राज्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे आग्रहाने लावून धरु आणि एका महिन्यात त्यांचे प्रश्न सोडवू असा दावा वडेट्टीवार यांनी केलाय. विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये, सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असं आश्वासनही वडेट्टीवार यांनी दिलंय.