मुंबई : शिवसेनेशी बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकारला पाडत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. तर त्यांना साथ देणारे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. या दोघांसहीत मंत्रिमंडळविस्तारानंतर झालेले 8 नवे कॅबिनेट मंत्र्यांसाठी हे पहिले अधिवेशन आहे. त्यामुळे शिंदे सरकार आज विरोधकांचा कसा सामना करणार हे पहायला मिळणार आहे. दरम्यान या घटनाबाह्य सरकारची या अधिवेशनात कसोटी लागणार अशी सामनातून टीका देखील करण्यात आली आहे. तर आजच हे अधिवेशन राज्यातील पूरस्थिती, शेतकऱ्यांना मदत, शिंदे गटातील आमदार आणि भाजपच्या आमदारांचं वादग्रस्त वक्तव्य, ठाकरे सरकारच्या कामांना स्थगिती, तर सगळ्यात कळीचा मुद्दा हा 12 आमदारांच्या नियुक्तीचा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अधिवेशनात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता असून ही अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.