गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने आज तिसऱ्या दिवशीही मुंबईला झोडपले. रात्रभरापासून कोसळणाऱ्या पावसाने सकाळी चांगलाच जोर धरला. त्यामुळे ठाणे ते नाहूर स्टेनश दरम्यान रेल्वे रुळावर पाणीच पाणी झालं. संपूर्ण रेल्वे ट्रॅक जलमय झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. या मार्गावरून रेल्वे धीम्यागतीने सुरू होती.
तब्बल 20 मिनिटे उशिराने लोकल धावत होती. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर निघालेल्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला. पाऊस, लोकलचा खोळंबा आणि त्यामुळे झालेली गर्दी यामुळे चाकरमान्यांची चांगलीच गैरसोय झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अडचणींना सामोरे जावं लागल्याने चाकरमानी वैतागले होते.