मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा वर्ध्यातील कारच अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायला हॉस्टेलच्या बाहेर पडलेल्या या विद्यार्थ्यांना आपण पुन्हा जिवंत परत येऊ शकणार नाही, अशी निघताना पुसटीशी कल्पना नसेल. सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर पडलेल्या मेडिकल कॉलेजमधील सात मित्रांच्या महिंद्रा एक्सयूव्ही कारचा नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात कार तब्बल चाळीस फूट खोल नदीत पडली. कारमधील सातही जण अपघातात जागीच ठार झाले. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती, की कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी तब्बल चार तासांचा अवधी लागला. नदीच्या पुलावर असलेला संरक्षक कठडा तोडून कार थेट खाली कोसळली होती.