Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटना मजबूत करण्यासाठी मोठी रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे. बंडखोरी केलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये स्वतः दौरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटना मजबूत करण्यासाठी मोठी रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे. बंडखोरी केलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये स्वतः दौरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे ईशान्य मुंबई, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशीम आणि शिर्डी या सहा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात ईशान्य मुंबई मतदारसंघापासून होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांबाबत जास्त विचार न करता संघटनात्मक कामावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. “जे सोडून गेले त्यांचा विचार करू नका, पुन्हा जोमाने कामाला लागा,” असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचे सूत्रांकडून समजते.
धाराशिव मतदारसंघासंदर्भात झालेल्या बैठकीतही ठाकरे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांना सोबत घेऊन संघटना अधिक मजबूत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे.
सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत उद्धव ठाकरे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, त्यातून पक्ष संघटनेला नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
