नीलम गोऱ्हे की शितल म्हात्रे? विधान परिषदेसाठी कोणाची वर्णी लागणार?
महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या विधान परिषदेसाठी कोणत्या पक्षातून कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा रंगल्या आहेत. अनेकांनी नावे जाहीर केली असून अनेक पक्षांमधील तिढा कायम आहे. दरम्यान, शिंदे गटाकडे दोन जागा असताना, बच्चू कडूंशिवाय उर्वरित जागेसाठी आणखी एका नावाची चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या विधान परिषदेसाठी कोणत्या पक्षातून कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा रंगल्या आहेत. अनेकांनी नावे जाहीर केली असून अनेक पक्षांमधील तिढा कायम आहे. दरम्यान, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि आक्रमक नेते बच्चू कडू यांनी आपली संघटना सुरूच ठेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना मजबूत करणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, बच्चू कडू आज शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात रात्री उशिरापर्यंत महत्त्वाची बैठक झाल्याची माहितीही समोर आली आहे. शिंदे गटाकडे दोन जागा असताना, बच्चू कडूंशिवाय उर्वरित जागेसाठी आणखी एका नावाची चर्चा सुरू आहे. या जागेसाठी शीतल म्हात्रे किंवा नीलम गोऱ्हे यांची नावे पुढे येत आहेत. मात्र, नीलम गोऱ्हे यांच्या नावाला पक्षांतर्गत काही प्रमाणात विरोध असल्याचेही सांगितले जात होते. तसेच राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच एकनाथ शिंदे यावेळीही धक्का तंत्राचा वापर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच, शिंदे गटातील विधान परिषद उमेदवारीबाबतचा तिढा अद्याप कायम असून, पुढील काळात नेमके कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
