कोरोना संसर्गामुळे येवला तालुक्यातील प्रतिपंढरपूर समजले जाणारे विठ्ठलाचे कोटमगाव येथे सलग दुसऱ्या वर्षी आषाढी एकादशीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा इतिहासात दुसऱ्यांदा रद्द करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे एक ते दीड लाख भाविकांचा हिरमोड झाला. दरवर्षी आषाढी यात्रा कालावधीत श्रींचे २४ तास दर्शन सुरू असते. पांडुरंगाच्या भक्तांमध्ये व वारकऱ्यांसह सर्व भाविकांच्या मनामध्ये विठ्ठल माऊलीची मूर्ती म्हटले कि डोळ्यासमोर दोन्ही हात कटेवर ठेवलेल्या रुपात असलेले विठ्ठलाचे रुप समोर येते. मात्र संपूर्ण देशात एक हात खाली व एक हात कटेवर असलेली विठ्ठलाची मुर्ती येवला तालुक्यातील विठ्ठलाच्या कोटमगाव येथे आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार मंदिर प्रशासनाने यात्रा आणि दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.