भाजपच्या आणखी अडचणी समजून घेऊ शकत नाही, उद्धव ठाकरे फ्रंटफूटवर
जागावाटपाच्या वेळी भाजपच्या अडचणी समजून घेऊन मी कमी जागा स्वीकारल्या आहेत. पण त्यांच्या अडचणीत वाढ होत असेल, तर मी सगळ्या अडचणी समजून घेऊ शकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले
मुंबई : जागावाटपाच्या वेळी भाजपच्या अडचणी समजून घेतल्या, पण आता भाजपच्या सगळ्या अडचणी मी समजून घेऊ शकत नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपला 50-50 फॉर्म्युला लागू करण्याची वेळ आल्याची आठवण (Uddhav Thackeray to BJP) करुन दिली.
विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेले पहिले ठाकरे – आदित्य ठाकरे निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला.
‘निवडणूक म्हटलं की हार जीत होतच असते. युतीचे सरकार स्थापन होऊ शकेल एवढ्या जागा जनतेने दिल्या आहेत. जनतेने जागरुकपणे मतदान करत सर्वच पक्षांचे पाय जमिनीवर ठेवले आहेत. पक्ष बदलणाऱ्यांना पराभूत करण्याचं सगळ्यात मोठं काम जनतेने काम केलं आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी निकालाआधी घोषणा केलेल्या 7 मंत्र्यांचं काय झालं?
जागावाटपाच्या वेळी भाजपच्या अडचणी समजून घेऊन मी कमी जागा स्वीकारल्या आहेत. पण त्यांच्या अडचणीत वाढ होत असेल, तर मी सगळ्या अडचणी समजून घेऊ शकत नाही. आता अत्यंत पारदर्शकपणे दिल्लीच्या नेत्यांशी चर्चा करु. अमित शाह येतील मग आम्ही चर्चा करु, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट (Uddhav Thackeray to BJP) केलं.
फॉर्म्युल्यावर निर्णय झाल्यावरच सरकार स्थापनेचा दावा करण्यात येईल. सत्तास्थापनेची घाई नाही मात्र सर्व पर्याय खुले आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. हा इशारा नाही, पण जे ठरलं होतं त्याची आठवण नक्की करुन देणार आहे. सत्तेची हाव माझ्या डोक्यात नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
सर्वच पक्षाचे डोळे उघडणारा हा जनादेश आहे. जनतेने ज्या अपेक्षेने आम्हाला आशीर्वाद दिलाय, त्या अपेक्षेनुसार काम करणार असल्याचंही ते म्हणाले.
आईवडील म्हणून आम्हाला आदित्यचा अभिमान आहे. मी यासाठी जनतेसमोर नतमस्तक होतो. हे आशीर्वाद कायम असू द्यात, असं मागणं उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray to BJP) मागितलं.